आत्महत्या
(आत्ताच्या कविता ह्या काव्यफाइलीतून)
श्रीधर तिळवे नाईक
१
सुशांतची आत्महत्या माझी आत्महत्या नाही
तुझी आत्महत्या नाही
म्हणूनच ती काल्पनिक आहे
आकलनाची सुरवात इथून होते
२
मेलेला कशाने मेला
ह्यावर चर्चा करून
मेलेला परतत नाही
३
आपण आपलं आयुष्य जगावं कि नाही
हा प्रश्न विचारणारा
मूळात मुक्त आहे का
कि तो
समाजाने तयार केलेला
आर्टिफिशियल इंटीलिजन्स आहे ?
४
आत्महत्या करतांना
मी प्रश्न विचारतो
आणि आत्महत्या थांबतात
अनेकदा आत्महत्या
चुकीच्या प्रश्नांच्यामुळे
निर्माण झालेली असते
५
आपण आपल्या आयुष्याची लायकी ठरवतो
कि ते जगायच्या लायकीचे आहे
किंवा मरायच्या लायकीचे आहे
कशाच्या आधारे ?
लायकी आयुष्याचा भाग आहे का ?
कि ती प्रोग्रामड आहे ?
६
आपण समाजाला नकोसे झालो
ह्यामागे
आपण समाजाला हवेसे असायला हवोत
हे अपआकलन असते
७
अनेकदा
आत्महत्या हा फक्त विचार असतो
आणि आपण विचाराच्या आहारी जातो
विचार आयुष्याचा पाया नाही
साधन आहे
आणि साधन आपण वापरू तसे वळते
८
आत्महत्या
बुटांच्या मापात बसत नाहीत म्हणून
पायांना संपवणे असते
बूट काढ
पाय मोकळे होतील
आणि नाचायला लागतील
श्रीधर तिळवे नाईक
श्रीधर तिळवे नाईक
No comments:
Post a Comment